देहूगाव: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र देहूगाव येथे श्रावण शुद्ध एकादशीच्या पर्वावर 'नमामि इंद्रायणी महाआरती' आणि नगरप्रदक्षिणा उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाली. या उपक्रमात वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इंद्रायणी नदीची स्वच्छता, संवर्धन आणि पावित्र्य राखण्याचा संकल्प केला.

इंद्रायणी नदी संवर्धन आणि स्वच्छता उपक्रम

इंद्रायणी नदी ही संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेशी जोडलेली पवित्र जलवाहिनी आहे. नदीचे संवर्धन, स्वच्छता आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी तीर्थक्षेत्र संवर्धन समिती, देहू यांच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून इंद्रायणी घाट स्वच्छता व सुशोभीकरणाचे उपक्रम राबवले जात आहेत.

हा संयुक्त उपक्रम संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, देहू नगरपंचायतीच्या अध्यक्षा पूजाताई दिवटे आणि जागतिक वारकरी संप्रदाय संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. अनिकेत महाराज मोरे देहूकर (यु.एस.ओ. वारकरी) यांच्या सहकार्याने तीर्थक्षेत्र संवर्धन समितीमार्फत आयोजित करण्यात आला.

वारकरी परंपरेनुसार नगरप्रदक्षिणा व महाआरती

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५ वाजता पारंपारिक नगरप्रदक्षिणेने झाली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता इंद्रायणी घाटावर महाआरती करण्यात आली. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आरती, संत तुकाराम महाराज आरती आणि भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज रचित 'धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥' ही इंद्रायणी मातेची आरती वारकरी संप्रदायिक पद्धतीने घेण्यात आली.

प्रत्येक शुद्ध एकादशीला होणार महाआरती

धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी यापुढे प्रत्येक शुद्ध एकादशीला देहूगाव येथे नियमितपणे इंद्रायणी महाआरती आणि नगरप्रदक्षिणा आयोजित करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.